मुलगी असेल तरच भविष्य उज्वल आहे ‘गोडूली आली घरा-तोच दिवाळी दसरा’ – डॉ. सुधा कांकरिया

बातम्या

अ.नगर – येथील सिव्हिल हॉस्पिटल मधील 45 नवजात मुली-गोडूलीचे स्वागत सन्मान झबल टोपड देऊन तर त्यांच्या मातांचा सन्मान पौष्टीक खारीक खोबर्‍याचे पॅकेट तसेच सन्मानपत्र देऊन करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने गोडूली आली घरा-तोच दिवाळी दसरा या अंतर्गत सिव्हिल हॉस्पिटल मधील 45 नवजात लेकींचा व आईचा अत्यंत भावस्पर्शी स्वागत-सन्मान करण्यात आला. अशी माहिती या प्रोजेक्टच्या चेअरमन व स्त्रीजन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्यप्रवर्तक डॉ. सुधा कांकरिया यांनी दिली. आतिरिक्त सिव्हिल सर्जन डॉ. गुरावले हे अध्यक्षस्थानी होते तर डॉ. निर्मला पालेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदर प्रसंगी सौ. अनघा राऊत, सौ. साधना देशमुख, सौ. प्रिती सोनवणे, सौ. नेहा जाधव, सचीव श्री सुभाष गर्जे, माधव देशमुख, रविंद्र राऊत, हर्षवर्धन सोनवणे, सुहास क्षिरसागर, आदिनाथ ठोंबे, मेट्रन ज्योती लोंढे तसेच कविता चव्हाण उपस्थित होते. अतिरिक्त सिव्हिल सर्जन डॉ. गुरावले यांनी सदर प्रोजेक्टचे कौतुक करून रोटरी क्लबचे अभिनंदन केले. आपला आदर्श समोर ठेऊन इतर संस्थानेही पुढे यावे असे ते म्हणाले. सदर प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना डॉ. सौ. निर्मला पालेकर म्हणाल्या की आम्ही गेल्या 12 वर्षा पेक्षा जास्त काळापासुन डॉ. सुधाताईंचे हे कार्य पहात आहोत. आज त्यांच्या समवेत सदर कार्यक्रमात सहभागी होतांना आम्हाला आनंद होत आहे. आपला अनुभव सांगतांना त्या म्हणाल्या की नवजात मुलींची प्रतिकार शक्ती मुलांपेक्षा अधिक असते. कितीही मोठे आजारपण आले तरी त्या त्यातुन तरून जातात. जन्माआधीच मुलींना मारून टाकणं हे महापाप आहे. सदर प्रसंगी दुसर्‍यांदा नात झालेल्या आजीनेही आपले मनोगत व्यक्त केले म्हणाल्या की लेकीचं जीव लावतात. शेवट पर्यंत त्यांच्याच प्रेमाचा आधार असतो. हे मी माझ्या अनुभवावरून सांगत आहे. त्यामुळे मला दुसरी नात झाली याचा विशेष आनंद आहे. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचे सचीव श्री सुभाष गर्जे यांनी केले. सदर प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना डॉ. सुधा कांकरिया म्हणाल्या की मुलगी जगली वाचली तरच जग तरणार आहे. मुलगी आहे म्हणूनच आपले भविष्य उज्वल होणार आहे. आज आपण नवरात्री निमित्त स्त्रीशक्तीचा जागर करतो, धनासाठी लक्ष्मीची पुजा करतो, ज्ञानासाठी सरस्वतीची भक्ती करतो तर अन्यायाविरूध्द लढण्यासाठी दुर्गा माते कडून बळ घेतो. असे असले तरी आजची शोकांकिका आहे की आजची गोडूली गर्भात किंवा समाजात कुठेच सुरक्षित नाही. प्रत्येक घरोघरी स्त्रीजन्माचे स्वागत झाले तरच सामाजिक संतुलन निर्माण होणार आहे. अनघा राऊत आभार मानतांना म्हणाल्या की राखी पौर्णिमेच्या दिवशी ओवाळणीद्वारे प्राप्त झालेल्या रकमेतुन सदर सन्मान करण्यात आला याचा आम्हा सर्व रोटेरीयन भगिनींना विशेष आनंद होत आहे.

Leave a Reply